नैसर्गिक नाले-ओढ्यांचे अस्तित्व धोक्यात; शाश्वत जलव्यवस्थापनाची नागरिकांची जोरदार मागणी
काँक्रीटीकरण, अतिक्रमणे आणि जलमार्गांचे अरुंदीकरण ठरत आहे पाणी तुंबण्याचे मुख्य कारण
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था आणि विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही शहरातील प्रमुख रस्ते, चौक, महामार्ग आणि निवासी भाग प्रत्येक पावसात जलमय होत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अल्पकालीन पाऊस झाला तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, वाहनांचे नुकसान आणि मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
याप्रकरणी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देत पाणी तुंबण्याच्या समस्येवर तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात या समस्येमागे केवळ अतिवृष्टी नसून शहरातील नैसर्गिक जलप्रवाह, नाले-ओढे आणि पाणी मुरण्याच्या व्यवस्थेचा झालेला ऱ्हास हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या मते, एकेकाळी शहरातील मातीचे चर, नैसर्गिक नाले, ओढे, तलाव, तळी आणि मोकळ्या जागा पावसाचे पाणी सहज वाहून नेत आणि मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवत होत्या. मात्र अनियंत्रित शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर झालेले काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉकचा अतिवापर, रस्त्यालगतची वाढती बांधकामे आणि नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमणे यामुळे ही व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागा, सोसायट्यांची आवारे आणि अगदी झाडांच्या बुंध्यांभोवतीही काँक्रीट टाकल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे संपूर्ण पाणी जलनिस्सारण यंत्रणेवर अवलंबून राहत असून ती अल्पावधीतच अपुरी पडते. परिणामी अनेक भागांत शहरी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच शहरातील अनेक नैसर्गिक नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याचे पारंपरिक मार्ग अरुंद झाले असून काही ठिकाणी त्यांच्यावर अतिक्रमणे झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात महानगरपालिकेने शहरातील सर्व नैसर्गिक जलप्रवाह, नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक मार्गांचे वैज्ञानिक सर्वेक्षण व डिजिटल मॅपिंग करावे, त्यांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यातील सर्व विकासकामांना मंजुरी देताना नैसर्गिक जलप्रवाह अबाधित राहतील आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरेल, यासाठी कठोर निकष लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
शहरात रेन वॉटर रिचार्ज झोन, रेन गार्डन, जैविक जलनिस्सारण व्यवस्था (बायो-स्वेल्स), परमेएबल पेव्हमेंट, झिरपण खड्डे आणि खुल्या मातीच्या जागांचे संरक्षण यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरजही नागरिकांनी अधोरेखित केली आहे.
“शहराचा विकास म्हणजे केवळ काँक्रीटचे जंगल उभारणे नव्हे; तर नैसर्गिक जलप्रवाह, भूजल आणि पर्यावरणाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.
पाणी तुंबण्याच्या समस्येवर दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजनांवर मोठा खर्च करण्याऐवजी नैसर्गिक जलमार्गांचे संरक्षण, अतिक्रमणमुक्ती, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता वाढविणे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे वैज्ञानिक पुनरुज्जीवन करण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने सर्वंकष आणि दीर्घकालीन धोरण राबवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
