कोल्हापूर, दि.२८ जून २०२६ : समाजातील वाढती नकारात्मकता, द्वेष आणि वैचारिक अधोगती रोखण्यासाठी जागृत नागरिकांनी समाजप्रबोधनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार–२०२६ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन करत समाजहिताची कार्ये अधिक जोमाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि संतांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू राहावे, असे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय शाहू पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. आमदार सतेज (बंटी) पाटील आणि खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक, मानाचा फेटा, शाल आणि बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग, कृषी, आरोग्य, अध्यात्म, योग, सहकार, शासकीय व निमशासकीय सेवा तसेच वंचित व उपेक्षित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील ७५ मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, अनिल म्हमाने, संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संघसेन जगतकर तसेच जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्यपदक विजेते राहुल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा आणि बॅच देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिता काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर आणि स्वप्नील गोरंबे यांनी विशेष सहकार्य केले.
