मुंबई, दि. ८ जून : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीकडून राजेंद्र जैन यांचाच अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाला असून महाविकास आघाडीकडून एकही उमेदवार रिंगणात उतरला नाही.
राज्यसभेच्या या जागेसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला असला तरी मंगळवारी होणाऱ्या छाननी प्रक्रियेत तो तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जैन यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे मानले जात आहे.
ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यत्वामुळे निर्माण झाली होती. महायुतीने या जागेसाठी राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी
पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पक्ष संघटनेत त्यांनी मजबूत स्थान निर्माण केले असून विदर्भातील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
यापूर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठविण्यात आले होते. मात्र २०१६ मधील विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भाजपचे परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता. आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री होणार आहे.
छगन भुजबळांची सूचक नाराजी
राज्यसभेच्या या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता दिसून आली. या जागेसाठी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र पक्षाच्या कोअर कमिटीने अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत नाराजी व्यक्त केली. “आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, असे आमचे धोरण आहे,” असे म्हणत त्यांनी परिस्थिती स्वीकारल्याचे सांगितले. तसेच, “मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही,” या वक्तव्याद्वारे पक्षातील अंतर्गत राजकारणावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.
राजेंद्र जैन यांच्या राज्यसभेवरील संभाव्य निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भातून राष्ट्रीय पातळीवर आणखी एक प्रभावी प्रतिनिधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
