बचावकार्याचा घेतला आढावा; बाधितांच्या नातेवाईकांशी साधला संवाद, प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना
पिंपरी, दि. ११ जुलै २०२६: मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, महापौर रवी लांडगे, माजी महापौर योगेश बहल, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“मोशी येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि संवेदनशील आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही या दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासून मी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर माध्यमांद्वारे मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते.”
….सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
त्या पुढे म्हणाल्या, “कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्याची गुंतागुंतीची रचना यामुळे बचावकार्यात काही अडथळे निर्माण झाले. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येणारे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक दाखवावेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”
दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी संबंधित कंपनी, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्ही स्तरांवरून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.”
नातेवाईकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मी स्वतः बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांच्या भावना, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. लवकरच राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्या संयुक्त बैठकीत त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यांना न्याय मिळेल, यासाठी आवश्यक त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल.”
