वर्चस्ववादातून दहशत माजवणाऱ्यांचा उतरवला माज
राजारामपुरी : कोल्हापूरातील राजारामपुरी परिसरात वर्चस्ववादातून दहशत माजवणाऱ्या दोन टोळ्यांतील सराईत गुंडांची राजारामपुरी पोलिसांनी परिसरातून धिंड काढत त्यांचा माज उतरवला. पोलिसांच्या या कारवाईची शहरात जोरदार चर्चा रंगली असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
माऊली पुतळा परिसरात मागील बुधवारी रात्री दोन टोळ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. वर्चस्वाच्या वादातून झालेल्या या राड्यात दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले होते. घटनेनंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात पोलिसांनी एका गटातील योगेश नलवडे, सुरज दिंडे, रुतेश कुऱ्हाडे आणि गुरुनाथ कुऱ्हाडे यांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या गटातील विशाल माने उर्फ गोट्या लातूर, अमित दिंडे आणि रामू कलकुटकी यांनाही मंगळवारी अटक करण्यात आली. दोन्ही गटातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी या सर्व आरोपींची राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून माऊली पुतळा परिसरापर्यंत धिंड काढली. पोलिसी खाक्या दाखवत नागरिकांसमोर या गुंडांची धिंड काढण्यात आली. या कारवाईतून परिसरातील गुंडगिरी आणि दहशतीला आळा घालण्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.दरम्यान, या धिंडीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
