पालघर | प्रतिनिधी…….पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात पालघर पोलिसांना मोठे यश आले आहे. प्रेमसंबंधांच्या संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.
दि. २० मे २०२६ रोजी तलासरी पोलीस ठाण्यात राजन कलानभाई माच्छी (वय ५६, रा. पलगांव अगरमोरा फलीया, ता. उंबरगांव, जि. बलसाड, गुजरात) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यांचा मुलगा इतनेशभाई राजन माच्छी (वय ३३) याचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून निर्घृण खून केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तलासरी पोलीस ठाण्याची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी जेरी बाबु माच्छी (वय ३६, रा. पलगांव महादेव फलीया, ता. उमरगांव, जि. वलसाड, गुजरात) याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मयत आणि आरोपीच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच आरोपीची ३२ वर्षीय पत्नी हिचाही या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.
