२२ गहाळ मोबाईल शोधून मालकांना केले परत
भिलवडी प्रतिनिधी : भिलवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल २२ मोबाईल हँडसेट शोधून संबंधित मालकांना परत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली.
याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात गहाळ नोंद क्रमांक ३०७/२०२५ दाखल करण्यात आला होता. फिर्यादी तेजस भगवान मोरे (वय ३३, रा. भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली) यांनी तक्रार दिली होती.
भिलवडी परिसरातील गर्दीची ठिकाणे, प्रवासादरम्यान तसेच बाजारपेठेत नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. भिलवडी हे कोल्हापूर–पंढरपूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून येथील आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल हरविण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेरून मोबाईलचा शोध घेतला. पोलीस शिपाई धिरज खुडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस शिपाई धिरज खुडे, संतोष जाधव, सतपाल सावंत, गणेश शिंदे व अजित लिंबळे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शन लाभले.
गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी भिलवडी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
